जिल्ह्याविषयी:-
पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचा जन्म याच नगर जिल्ह्यातील चौंडी ता.जामखेड या गावी झाला. त्यांचे वडील मानकोजी शिंदे हे चौंडी ता.जामखेड या गावाचे पाटील होते. अहिल्यादेवींचे बालपण याच गावात गेले. त्या शिवभक्त होत्या. पुढे मराठा साम्राज्याचे इंदौर संस्थानच्या खंडेराव होळकर यांच्याशी त्यांचा विवाह झाला. त्या सुभेदार राजे मल्हारराव होळकर यांच्या त्या सून होत. त्यांच्या नंतर अहि
ल्यादेवी ह्या मध्य भारताच्या माळवा राज्याच्या महाराणी म्हणून 28 वर्ष राज्यकारभार सांभाळला.त्यांनी भारत देशात ठिकठिकाणी मंदिरे, धर्मशाळा, घाट, पाणपोई- विहिरी, बारवे, अन्नछत्रे उभारले.
निजामशाहीचा संस्थापक निजाम अहमद होय. मध्ययुगीन कालखंडात दक्षिण हिंदुस्थानमध्ये ज्या पाच शाह्या होऊन गेल्या त्यामध्ये अहमदनगरची निजामशाही ही स्वराज्याच्या पायाभरणीसाठी पूरक ठरली होती. हिंदुस्थानामध्ये मुस्लिम सत्तेची सुरुवात झाल्यानंतर विविध भागांत त्यांनी आपली सत्तास्थाने निर्माण केली होती. त्यासोबत अनेक वास्तूंची निर्मितीही झाली होती. आपल्या साम्राज्यविस्ताराचा एक भाग म्हणून त्यांनी संबंधित राजधानीला वा वास्तूला स्वतःची वा परिवाराची नावे दिली. त्यानुसार अहमदनगरच्या निजामशाहीला हे नाव मिळाले. या निजामशाहीचा इतिहास मोठा रोमांचकारी आहे.
अहमदनगर हे मूळचे शहर नसून प्रसंगानुसार त्याची उभारणी झालेली आहे. देवगिरीवर स्थापन झालेल्या बहामनी राज्यात निजाम उल मुल्क पदवी धारण करणारा मलिक अहमद हा मूळचा हिंदू असून परभणी जिल्ह्यातील पाथरीच्या बहिरंभट कुलकर्णीचा नातू होता.त्याच्या वडिलांनी-तिमाभटाने मुस्लिम धर्म स्वीकारला होता. मलिक अहमद हा तिमाभटाचा मुलगा असून बहामनी साम्राज्यात पराक्रम गाजवत तो सुभेदार पदापर्यंत पोहोचला. बहामनी साम्राज्याचा दिवाण महंमद गावानमुळे विस्तार झाला, परंतु राज्यकारभारावरील पकड ढिली होत गेल्याने बहामनी साम्राज्यातील प्रत्येक सुभेदाराने स्वतःचे स्वतंत्र राज्य स्थापले.
मलिक अहमदने जुन्नर या ठिकाणी राजधानी ठेवून स्वतःचे निजामशाही नावाचे स्वतंत्र राज्य झाल्याचे घोषित केले. तेव्हा बहामनीच्या फौजांनी मलिक अहमदवर आक्रमण केले. तेव्हा भिंगार गावाजवळील इमाम घाटात त्याने बहामनी सैन्याचा दारुण पराभव केला. विजय मिळवून देणारा परिसर म्हणून याच ठिकाणी २८ मे १४९० रोजी त्याने एका शहराची स्थापना केली. त्याला नाव दिले अहमदनगर. विशेष म्हणजे मलिक अहमदच्या फौजेत असणाऱ्या राजा, सेनापती, प्रधान आणि काझी अशा सर्वांच्याच नावात अहमद होते.
आपल्या मूळ पुरुषाच्या नावावरून या घराण्याने बहिरंभटावरून बहिरी नाव धारण केले तर पुढे प्रत्येक राजाने स्वतःला निजामशहा हा किताब लावला तर त्यांच्या साम्राज्याला निजामशाही म्हटले गेले. मलिक अहमद निजामशहा बहिरीने त्या ठिकाणी एका भुईकोट किल्ल्याची पायाभरणी केली आहे. त्यानुसार अहमदनगरमध्ये अंडाकृती किल्ला बांधला. या किल्ल्याचा परीघ मैलाचा असून किल्ल्याच्या भोवती मोठा खंदक, तर बाजूने २२ मोठे बुरूज आहेत. किल्ल्यामध्ये पाण्याकरिता गंगा, जमुना, मछलीबाई व शक्करबाई नावाच्या ४ विहिरी असून सोनमहल, मुल्कआबाद, गगन महल, मीना महल, बगदाद महल यांसारखे महाल बांधले. दिवसेंदिवस यात वाढ होत गेली.
तत्कालीन कालखंडात या किल्ल्याच्या आजूबाजूला एका स्वतंत्र शहराची निर्मिती झाली. त्या भागाला कोटबाग निजाम म्हटले गेले. या कोटबाग निजामचे वैभव एवढे मोठे,अतिभव्य होते की,याची तुलना कैरो व पॅरिससारख्या भव्य शहरांसोबत व्हायची.
अहमदनगरच्या निजामशाहीत एकूण ११ निजाम होऊन गेले आहे. त्यापैकी चौघांचे खून झाले. १२५ वर्षे ही राजसत्ता टिकली. निजाम या शब्दाचा अर्थ होतो जमिनीची व्यवस्था पाहणारा, त्यामुळे संबंधित सुभेदाराला निजाम उल मुल्क ही पदवी असायची. अशी पदवी असणाऱ्या दोन सरदारांनी स्वतःचे राज्य निर्माण केले. पहिले १४९०ची अहमदनगरची निजामशाही आणि दुसरी १७२४ची हैदराबादचे निजामशाही. या दोन सत्तांचा परस्पर काहीही संबंध नाही.
अहमदनगरच्या निजामशाहीत मलिक अंबरसारखा शूर आणि धोरणी प्रधान होऊन गेला. त्याने जमीन महसूल व्यवस्था सुधारली. शिवाय शत्रूशी लढण्याकरिता गनिमी काव्याच्या युद्धनीतीचा अवलंब केला. म्हणून त्याला गनिमी कावा युद्धनीतीचा जनक म्हटले जाते. स्वराज्याला पोषक ठरणारी पार्श्र्वभूमी याच निजामशाहीने दिली. कारण छत्रपती शिवाजीवे मूळ पुरुष बाबाजी भोसलेंपासून आजोबा मालोजीराजे, वडील शहाजी भोसलेंसह सर्व भाऊबंद याच निजामशाहीत पुढे आले/आहे. एवढेच नाही तर मालोजीराजे यांनी इंदापूर या ठिकाणी तर चुलते शरीफजी यांनी भातोडी (नगरजवळील)या ठिकाणी झालेल्या युद्धात निजामासाठी प्राणार्पण केले.
स्वराज्य संकल्पक शहाजीराजे घडले तेच मुळी निजामशाहीत होत. मलिकअंबर नंतर त्यांनी निजामशाही वाचविताना मुर्तुजा निजामाला घेऊन परांडा या ठिकाणी गादी ठेवून स्वतंत्रपणे कारभार चालविला. शाहजहानने स्वतः निजामशाही विरोधात मोहीम आखली नसती तर शहाजीराजांनी स्वतःच स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली असती. भोसले घराण्याबरोबर याच निजामशाहीत सिंदखेडचे जाधव, फलटणचे निंबाळकर घराणे नावारूपाला आले. या एकत्रितपणामुळेच विवाहबंधनांतून नवीन कार्याची निर्मिती झाली. भोसले व घोरपडे हे घराणे मूळ एकच असून या घराण्यातील कर्णसिंहाला निजामाने राजे घोरपडे-बहाद्दर नावाचा किताब दिला होता. तेव्हापासून घोरपडे हे नाव उदयास आले. सोलापूर, परांडा, औसा, उदगीर, धारूर,देवगिरी यांसारखे अनेक भुईकोट किल्ले निजामशाहीतच पुढे आले. साम्राज्यविस्तार करताना आदिलशहाबरोबर झालेल्या युद्धात इब्राहिम निजामशहा ५ ऑगस्ट १५९५ रोजी नळदुर्ग येथे मरण पावला परंतु निजामशहा आणि आदिलशहाचे संबंध सुरळीत राहिल्याने पहिल्या बुऱ्हाणशहाला (१५०८ ते १५५३) इस्माईल आदिलशहाची मुलगी दिली होती. तर हुसेन निजामशहाची मुलगी चांदबिबी ही अली आदिलशहाला दिली होती. या शाही विवाहात सोलापूरचा किल्ला आंदण म्हणून वापरला गेला.
निजामशाहीची देणगी म्हणजे हुसेन निजामशहाच्या काळात चिकबुरूज नावाने जगातील भव्य असणारी तोफ. ५५ टन वजनाची ही तोफ बरेच दिवस परंड्याच्या किल्ल्यात होती. पुढे परंडा आदिलशहाकडे आल्यानंतर ऑगस्ट १६३२ साली ती विजापूरला गेली. तोफ वाहून नेण्याकरिता १० हत्ती व ४०० बैल लागायचे. सोलापूर व विजयनगरवर याचा वापर झाला. विजापूरच्या सर्जा बुरुजावर मुलुखमैदान नावाची ही तोफ पर्यटकांचे आकर्षण आहे.शेवटचा निजामशहा मुर्तुजा (तिसरा) हा मोगलांच्या कैदेत गेला आणि १६३६ साली हे निजामशाही साम्राज्य बुडाले.
तेव्हापासून १७५९ पर्यंत अहमदनगर मोगलांच्या ताब्यात होते. शाहिस्तेखान, मिर्झाराजे जयसिंग आणि औरंगजेबाने छत्रपती शिवाजीविरोधात मोहीम आखण्यापूर्वी बरेच दिवस नगरमध्ये मुक्काम ठोकला होता/आहे. मोगलांचा विजापूरकडे जाणारा रस्ता म्हणजे औरंगाबाद, अहमदनगर, परंडा, काटी, जरखेड, मोहोळवरून पुढे जायचा. छत्रपती शिवाजी महाराजांनाही नगरचा किल्ला ताब्यात राहावा अशी इच्छा होती. म्हणून त्यांनी ३० मे १६६४ साली आक्रमण केले होते. मध्ययुगीन कालखंडातील फेरिस्तासारखा इतिहासकार निजामशाहीतच घडला गेला.
मराठा साम्राज्याच्या विरोधात मोहीम काढणारा औरंगजेब शेवटी परत जाण्याकरिता निघाला तेव्हा १७०६ ते १७०७ या दरम्यान अहमदनगरमध्येच राहिला होत.त्यामुळे त्याच्या कैदेत असणाऱ्या छत्रपती शिवरायांच्या पत्नी सकवारबाई, शंभूराजांच्या पत्नी महाराणी येसूबाई, मुलगा शाहूसह अनेक मराठ्यांनी अहमदनगरचा पाहुणचार घेतलेला आहे. एवढेच नाही तर सतत २६ वर्षे दक्षिणेच्या मोहिमेवर असणारा औरंगजेब वार्धक्यामुळे २० फेब्रुवारी १७०७ रोजी अहमदनगरमध्येच वारला आहे.
पुढे १७५९ साली मराठ्यांनी हा किल्ला जिंकून घेतल्यानंतर तो महादजी शिंदेच्या जहागिरीत होता. मराठी साम्राज्यात घडलेल्या घडामोडींमुळे नाना फडणिसांना नगरच्याच किल्ल्यात ठेवण्यात आले होते. पुढे १८१७ रोजी तो ब्रिटिशांनी जिंकल्याने त्यांनी अहमदनगरला लष्करी छावणी उभारली. ती आजही कायम आहे. पहिल्या महायुद्धानंतर जर्मनीचे कैदी याच किल्ल्यात ठेवण्यात आले होते. ब्रिटिशांमुळे शहराच्या आधुनिकीकरणाला चालना मिळाली तर १९४२ला स्वतंत्र भारताच्या निर्मितीसाठी काँग्रेसने आंदोलन उभे केले तेव्हा अनेक राजकीय कैदी नगरच्या किल्ल्यात डांबण्यात आले. पैकी भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंचा मुक्काम दोन वर्षे होता. यादरम्यान त्यांनी ‘डिस्कवरी ऑफ इंडिया’ नावाचा ग्रंथ इथेच लिहिला. याच ठिकाणी तुरुंगात असताना आंबेडकरांनी ‘थॉट ऑफ पाकिस्तान’ व मौलाना आझादांनी ‘गुबारेखातीर’ लिहून काढला आहे.
छत्रपती शिवरायांचे एक विश्वासू सेनापती खंडेराव कदम नगरजवळील प्रवरा देवळालीचे रहिवासी. अशा रीतीने अहमदनगरची निजामशाही म्हणजे हिंदू-मुस्लिमांचा मिलाफ होता. एवढेच नाही तर अल्लाउद्दीन खिलजीनंतर दक्षिणेतील हिंदूंची तलवार म्यान झाली होती. तिला पुन्हा प्रतिष्ठा मिळवून देण्याचे काम निजामशाहीत घडून आले. एका अर्थाने अहमदनगरची निर्मिती स्वतः मलिक अहमदने केलेली असल्याने या शहराच्या नामांतराचा विषय कधी चर्चेला आल्याचे दिसत नाही.
निजामाच्या सहिष्णुतेमुळेच अनेक मराठा सरदार तर पुढे आलेच शिवाय ज्ञानेश्वररांपासून ते शेख महंमदापर्यंतचे अनेक संत याच परिसरात निर्माण झाले. म्हणूनच संतकवी दासगणूंनी अहमदनगरविषयी लिहिताना म्हटले आहे की, मराठेशाहीचे जननस्थान पुण्यभूमी महापावन आहे.
मराठ्यांच्या कर्तृत्वाच्या उदयकाली विठोजी भोसले, मालोजी भोसले, लखुजी जाधवराव निंबाळकर, पवार, बाजी कदमराव हे निजामशाहीचा चौथा सुलतान मुर्तझा निजामशाह आणि पुढे मलिक अंबर ह्याच्या पदरी सेवेत होते. देवळाली प्रवरा येथील सरदार बाजी कदमराव ह्यांना साल्हेर आणि मुल्हेर हे किल्ले, किल्ल्यावर फितवा करून मिळवून दिल्याबद्दल देवळाली प्रवरा आणि रुई ही गावे इ.स. १५८० साली इनाम मिळाली होती. पुढे विजापूरकारांशी लढताना बाजी कदमांचा बंकापूर ( कर्नाटक ) येथे मृत्यू झाला. आजही त्यांचे वंशज हे देवळाली प्रवरा येथे आहेत. पुढे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सेवेत हे घराणे आले. खंडेराव कदम आणि तिसरे बाजी हे शिवाजी महाराजांचे अत्यंत विश्वासू सरदार होते. ह्यांच्याकडे राजगड किल्ल्याची तटसरनौबती होती. छत्रपती शिवाजी महाराजांनी दक्षिण दिग्विजय मोहिमेत तामिळनाडू येथील वली गंडापुराम हा किल्ला जिंकला. ह्या किल्ल्याची किल्लेदारी कदमांकडे होती. छत्रपती राजाराम महाराजांच्या जिंजी मोहिमेतही कदमांनी स्वराज्यासाठी आपले पूर्ण योगदान अर्पण केले. पानिपतच्या लढाईत ह्या घरातील सात पुरुष कामी आले. आजही कदमांकडे पारंपरिक आणि दुर्मिळ अशी जुनी शस्त्रे जपलेली आहेत. त्यांत धोप तलवारी, गूर्ज, कट्यारी, ढाली, बिचवे, हस्तिदंती गुप्त्या, भाले, शिवकालीन शिवराया आणि इतर ऐतिहासिक साधने आहेत.
अहमदनगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा हे नगर जिल्ह्यातील पहिली नगरपालिका असलेले शहर आहे.देवळाली प्रवरा नगरपालिकेस भारताच्या माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील ह्यांच्या हस्ते "राष्ट्रीय भूजल पुरस्कार"मिळालेला आहे.हा पुरस्कार मनमोहन सिंग व तत्कालीन कृषिमंत्री शरदराव पवार ह्यांच्या उपस्थितीत नगराध्यक्ष श्री मुरलीधर कदम ह्यांनी स्वीकारला होता.देशातील फक्त ह्या एकाच नगरपालिकेला हा सन्मान मिळालेला आहे.
जिल्ह्याचे रूपरेखा
सहकारातून ग्रामोध्दार व संतांची भूमी म्हणून ओळखला जाणारा अहमदनगर जिल्हा पश्चिम महाराष्ट्राच्या मध्यभागी वसलेला आहे. क्षेञफळाच्या दृष्ट्टीने महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर असलेल्या या जिल्हयाचे एकूण भौगोलिक क्षेञ १७०४८ चौ.कि.मी. असून ते राज्याच्या क्षेञफळाच्या ५.६ टक्के आहे.
या जिल्हयाच्या उत्तर सीमेवर नाजिक ईशान्येस औरंगाबाद पूर्वेस बीड व उस्मानाबाद हे जिल्हे असून दक्षिण सीमेवर सोलापूर, पश्चिम सीमेवर ठाणे व पुणे जिल्हे लागून आहेत. २०११ च्या जनगणनेप्रमाणे जिल्हयाची एकूण लोकसंख्या ४५४३१५९ आहे.
पश्चिमेकडील डोंगराळ भाग व पूर्वेकडील सखल भाग हे जिल्हयाचे स्वाभाविक विभाग आहेत. पश्चिम भागातील हवामान थंड व कोरडे तर पूर्व भागातील हवामान उष्ण व कोरडे आहे. जिल्हयातील सरासरी पर्जन्यमान ३८२ मि. मीटर इतके असून पर्जन्यमानाची वाटणी असमान आहे.
गोदावरी व भीमा या जिल्हयातील प्रमुख नद्या आहेत. अहमदनगर जिल्हयाच्या उत्तर सीमेवरुन गोदावरी नदी वाहते. प्रवरा व मुळा या तिच्या उपनद्या आहेत. भीमा नदी जिल्हयाच्या दक्षिण सीमेवरुन वाहते. दक्षिण भागातून सीना,हंगा, घोड या नद्या दक्षिणेकडे वाहतात. काळी लालसर, काळी बरड व पांढरी या प्रकारात जिल्हयाची जमीन विभागलेली आहे. जनगणना २०११ नुसार जिल्हयात १५८४ गांवे( तीन निर्जन गावांसह घानेगाव, सुजलपूर व गोंधवणी ) १४ तालुक्यात विखुरलेली आहेत. १४ पंचायत समित्या, १३११ ग्रामपंचायती, १ महानगरपालिका, ९ नगरपालिका,१ (शिर्डी ) नगर पंचायत व १ कटकमंडळ जिल्हयात आहेत.
रब्बी ज्वारी हे जिल्हयाचे मुख्य पिक, खरीप हंगामात बाजरी, भूईमूग, मठ, सोयाबीन व मूग ही पिके तर रब्बी हंगामात ज्वारी, गहु, हरभरा ही पिके घेतली जातात. ऊस हे जिल्हयाचे प्रमुख नगदी पिक असून त्यामुळे जिल्हयाची आर्थिक प्रगती झाली आहे. द्राक्षे, संञी, डाळींबेइ. फळांचे उत्पादनही जिल्हयात घेतले जाते. जिल्हयातील बागायत शेती प्रामुख्याने विहिरींच्या पाण्यावर केली जाते. गंगापुर, भंडारदरा, मुळा, घोड, कुकडी या धरणाच्या पाटपाण्यामुळे शेतजमिन ओलीताखाली येण्यास मदत झाली आहे.
सहकार क्षेत्रातील अग्रणी ही आपली ओळख अहमदनगर जिल्हा आजही जटकवून आहे. भारतातील पहिला सहकारी साखर कारखाना सन १९५० मध्ये प्रवरानगर येथे उभारला गेला. जिल्हयात २०१५-१६ या वर्षाअखेर सर्व प्रकारच्या एकूण ५२९५ सहकारी संस्था आहेत.
उद्योग क्षेत्रात अहमदनगर जिल्हा प्रगतीपथावर आहे. महाराष्ट्र राज्याच्या निम्म्याहून अधिक साखरेचे उत्पादनएकटया नगर जिल्हयात केले जाते. २०१६ अखेर जिल्हयात २० साखर कारखाने कार्यरत आहेत.
जिल्हयात मार्च २०१६ अखेर १०० टक्के विद्युतीकरण झालेलेअसून विद्युतीकरण झालेल्या खेडयांची व शहरांची संख्या १६०३ आहे.
अहमदनगर जिल्हयामध्येआरोग्य सेवे अंतर्गत सार्वजनिक व शासन सहाय्यित रुग्णालये, २० दवाखाने, ९६ प्राथमिक आरोग्यकेंद्रे व ५५५ उपकेंद्रे उपलब्ध आहेत.
अंगणवाडीपासून अभियांत्रिकी व वैद्यकीय महाविद्यालया पर्यंत तसेच कृषि विद्यापीठाच्या सर्व शैक्षणिक सोयी अहमदनगर जिल्हयात उपलब्ध आहेत. महाराष्ट्रातले पहिले कृषि विद्यापीठ राहुरी येथे स्थापन झाले असून कृषि अध्यापन व संशोधन क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देत आहे. सप्टेंबर २०१६ अखेर ५०४६ प्राथमिक शाळा, ९५६ माध्यमिक शाळा व १०८५ उच्च माध्यमिक शाळा जिल्हयात आहेत.
मध्य रेल्वेचा १९७ कि.मी. लांबीचा मार्ग जिल्हयातून जातो. सर्व प्रकारच्या २२१८६.८७ कि.मी.लांबीच्या रस्त्यांनी जिल्हयातील १५८४ गांवे जोडली असून महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे प्रवासी वाहतूकीचे विस्तृत जाळे या जिल्हयात आहे. एस. टी. मार्गाची एकूण लांबी ६०४७१ कि.मी.असून एस.टी. महामंडळाच्या ८४१ एस.टी. बसेस जिल्हयात रस्त्यावर धावतात.
सेंट्रल बँक ऑफ इंडिया ही जिल्हयाची अग्रणी बॅक असून जिल्हयात एकूण ६१० वर्गीकृत बँकाची कार्यालये आहेत. आशिया खंडात सहकार क्षेञात प्रथम क्रमांकावर असलेल्या अहमदनगर जिल्हा मध्यवती सहकारी बॅकेच्या व इतर सहकारी बॅकेच्या एकूण २९६ शाखा जिल्हयात मार्च २०१६ अखेर कार्यान्वित होत्या. अहमदनगर जिल्हयाची अन्नधान्याची बाजारपेठ महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे.
आदर्श ग्राम योजनेचा मानदंड स्थापित केलेले पारनेर तालुक्यातील राळेगणसिध्दी हे गांव आदर्श खेडे म्हणून प्रसिद्ध आहे. विविध राज्यातील प्रशासकीय अधिकारी व सामाजिक कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी, शासकीय प्राधिकारी,सामाजिक कार्यकर्ते व विविध देशी-विदेशी संस्था/ संघटनांचे प्रतिनिधी येथील कामांची पाहणी करण्यासाठी व अभ्यासासाठी भेट देत असतात. जलसंधारण, स्वच्छ इंधन इ. द्वारे लोकसहभागातून शाश्वत विकासाचा मूलमंत्र नगर तालुक्यातील हिवरेबाजार गावाने राज्यात घालून दिला आहे.
श्री साईबाबांची शिर्डी व अवतार मेहेरबाबांचे मेहराबाद ही अहमदनगर जिल्हयातील धार्मिक स्थळे ही भारतातील नव्हेतर जगातील अनेक भक्तांची श्रध्दा स्थाने आहेत. याशिवाय श्री ज्ञानेश्वर मंदिर (नेवासा), श्री शनी शिंगणापूर, श्री दत्त मंदिर (देवगड) व चौंडी ( पुण्यश्लोक अहिल्यादेवींचे जन्मस्थान), हजारो भाविकांचे श्रद्धास्थान भगवानगड (पाथर्डी) व सिध्दी विनायकाचे सिध्दटेक या तीर्थक्षेञांनी भाविकांच्या मनात अहमदनगर जिल्हयाचे आगळेवेगळे स्थान निर्माण केले आहे.