15/09/2022
दैनिक सामनामध्ये रविवार दिनांक 11 सप्टेंबर 2022 रोजी हरिती पब्लिकेशनने प्रकाशित केलेल्या समीना दलवाई यांच्या भटकभवानी या पुस्तकातील लेख प्रसिद्ध झाला.
------------------------------------------------------------------
बुगू बुगू... फाड फाड...
स्वत:च्याच अंगावर चाबकाचे फटकारे मारणारा चित्त शुद्धीवर असलेला माणूस बघितलाय का? परवा दादरच्या मध्यमवर्गीय वस्तीत अचानक पोतराज समोर आला. अंगावर काटा यावा असं जातिव्यवस्थेचं हे स्वरूप. कमरेपर्यंत जटा वाढलेल्या, चेहऱ्यावर आणि उघड्या अंगावर राखेने रेघा ओढलेला, कमरेभोवती चिंध्या गुंडाळलेला अन् पायांत चाळ बांधलेला माणूस अनवाणी पायी फिरत भीक मागत असतो. हातातल्या लांब आसूडाने स्वतःच्या अंगावर सटासट फटकारे मारून घेत असतो. त्या फटकाऱ्यांचा आवाज आसमंतात घुमत राहतो. सोबत त्याची तरुण बायको, कोवळी लेकरं फिरत असतात. बायकोच्या गळ्यात ढोलकं. ती वाजवत असते. बुगू बुगू बुगू.... तिच्या पदराला मूल. कधी पोटात मूल. अशा अवस्थेत ती त्याच्या मागे भटकत राहते. आपल्या तरुण सुदृढ पुरुषाला ना धड बाई ना धड पुरुष अशा अवतारात बघत राहते.
कोण आहे पोतराज ? का असा फिरतो ? महाराष्ट्रातल्या जातीच्या उतरंडीत सर्वांत खालची जात मातंग (मांग), पहिला मुलगा मरीआईला सोडून पोतराज बनण्याची प्रथा आहे. त्याने मग कपाळावर देवाचा मळवट भरून कमरेला चिंध्या बांधून फिरत राहायचं. मरीआई भारी कडक देवी. खूप घाबरतात लोक तिला. तिच्या भगताच्या अंगात येतं तेव्हा तो स्वतःला फटकावतो. दाभणीने अंगावर टोचून घेतो. इतरांनाही धरतो. बेदम मारतो. उन्मत्त होतो. इतर वेळी बापडा गावात अन् शेतात मजुरी करून पोट भरतो. एकविसाव्या शतकातही मातंगांची परिस्थिती फार बदललेली नाही. शिक्षण, शेती, उद्योगधंदे यांपासून परंपरेनेच दूर ठेवलेला हा समाज. गावागावांत गरिबी, व्यसन अन् अंधश्रद्धा यांनी वेढलेला आहे.
मरीआईचा पगडा कमी तरी कसा होणार?
जातिव्यवस्थेने वरच्या जातीच्या सर्व उद्योगांची ऐषोआरामाची सोय करून ठेवलेली आहे. कष्टकरी जाती तयार करून आणि त्यांना फुकट कामाला लावून. गावगाड्यात महाराचं काम म्हणजे मेलेली ढोरं ओढून नेणं, ढोरांचं किंवा मातंगाचं ढोर फाडणं, मातंगाचं चामडी बनवणं आणि चर्मकाराचं त्या चामड्याच्या चपला बनवण्याचं.
पण मातंगांनी या समाजासाठी नुसतं फुकट राबून भागत नाही. मरावंही लागतं. महाराष्ट्रात फिरताना अनेकदा गावांच्या वेशीवर मांगीराचं देऊळ दिसतं. हा आपला खास इतिहास आहे. कधी चर्चेत न आलेला. गावात नवीन कोणतं काम हाती घेताना नरबळी दिला जाई. धरण बांधायचं, गावाची वेस उभारायची, विहीर खणायची तर नशिबाची साथ पाहिजे. मग मातंग कुटुंबातला थोरला मुलगा धरायचा आणि साग्रसंगीत पूजा करून त्याला तिथे गाडायचा. जिवंत. नंतर त्याला मांगीर बाबा म्हणून पुजायचा. तिथे मांगीराचं देऊळ उभारायचं.
फार पूर्वी नाही तर १९८० च्या दशकातही या समजुतीपायी मातंगांना नवीन विहिरीत काही कामाकरिता उतरवून मारल्याची उदाहरणं आहेत. पुढच्या वेळी कधी बघाल असं देऊळ तर कान देऊन ऐका. एखाद्या आईचा टाहो ऐकू येईल तुम्हाला.
समीना दलवाई
संभाजी भगत यांची कविता आठवते?
कसा गं बाई जातीचा ह्यो किल्ला, धर्माचा ह्यो किल्ला कोणत्या भक्तानं बांधला
कोणाच्या रक्तानं बांधला...
https://pustakshop.com/index.php?id_product=4806&rewrite=&controller=product