Mukta Shabd

Mukta Shabd A radical Marathi Magazine working towards Change.

हरित वसईचे आंदोलन असो की महाराष्ट्रातील इतर विस्थापनांच्या संघर्षासाठी चालणारे लढे असोत सर्वांमध्ये फादर फ्रान्सिस दिब्र...
25/07/2024

हरित वसईचे आंदोलन असो की महाराष्ट्रातील इतर विस्थापनांच्या संघर्षासाठी चालणारे लढे असोत सर्वांमध्ये फादर फ्रान्सिस दिब्रिटो हिरीरीने पुढे असायचे. त्यांचे निधन ही अत्यंत दुःखद गोष्ट आहे. समाजाबाबत प्रचंड आस्था असलेला हा सृजन वृक्ष त्यांच्या कर्तृत्वाच्या रूपात कायमच आपल्यासोबत राहील.

संपादकीय मुक्त शब्द,जून २०२४अर्धा टक्का फरकाच्या पोटात----------------------------------------‘अब की बार ४०० पार’ या घोष...
12/06/2024

संपादकीय
मुक्त शब्द,जून २०२४

अर्धा टक्का फरकाच्या पोटात
----------------------------------------

‘अब की बार ४०० पार’ या घोषणेचा भारतीय जनतेने पार निकाल लावला. खुद्द मोदींची ही घोषणा होती. पुन्हा तिसऱ्यांदा प्रधानमंत्री पदाची शपथ घेताना त्यांना कबूल करावं लागलं, मोदी नव्हे, भाजप नव्हे तर एनडीएचं सरकार. लोकसभा २०२४च्या निकालाने भाजपचं नव्हे एनडीएचं सरकार आलं आहे. १०लाख मतांनी मोदी जिंकणार होते, ते फक्त दीड लाख मतांनी जिंकले आहेत.
४०० पार कशासाठी? तर ‘संविधान बदलण्यासाठी’ हा त्याचा अर्थ त्यांच्याच पक्षाच्या नेत्यांनी सांगितला होता. अयोध्येचे तेव्हा खासदार असलेले लल्लू सिंह, ‘आम्हांला संविधान बदलायचंय’ असं म्हणत होते. अयोध्येतल्या जनतेने त्यांचा दणदणीत पराभव केला आहे. श्रीरामाचं भव्य मंदिर बांधूनही त्यांना अयोध्येत पराभव स्वीकारावा लागला. फक्त अयोध्येतच नाही तर श्रीरामाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या प्रत्येक ठिकाणी भाजपचा पराभव झाला आहे.
भाजपचं धर्मद्वेषाचं राजकारण देशातील बहुतांश धार्मिक आणि सश्रद्ध जनतेने नाकारलं, हा या निवडणुकीचा पहिला निकाल आहे.
देशाची राज्यघटना हा निवडणूक प्रचाराचा मुद्दा बनू शकतो, याची कल्पना या पूर्वी कुणीही केली नव्हती. संविधान सन्मान किंवा संविधान बचाव यात्रांचा अर्थ संविधानात सामाजिक न्यायासाठी ठेवण्यात आलेल्या आरक्षणाच्या बचावापुरता लावला जात होता. पण संविधानच वाचलं नाही तर लोकशाही संपुष्टात येईल. हुकूमशाहीला मान्यता दिल्यासारखे होईल, याचं भान समाजातल्या मोठ्या वर्गाला आलं; केवळ दलित आणि आदिवासींना नव्हे. दलितांनी आपल्या पारंपरिक नेतृत्वाला आणि राजकीय पक्षांना तूर्त बाजूला ठेवून ‘इंडिया’ला मतदान केलं. त्याचा फटका उत्तरेत मायावतींच्या ‘बहुजन समाज पक्षा’ला आणि महाराष्ट्रात प्रकाश आंबेडकर यांच्या ‘वंचित बहुजन आघाडी’ला बसला. लोकसभेचा निकाल संविधानाच्या बाजूचा होता. लोकशाही व्यवस्था टिकवण्यासाठीचा होता. हा या निवडणुकीचा दुसरा निकाल आहे.
या निवडणुकीचा तिसरा निकाल आहे, तो दहा वर्षांनंतर देशाला मिळालेला मजबूत विरोधी पक्ष. मोदी आणि संघ-भाजपच्या गेल्या दहा वर्षांतील राजकारणाच्या रेट्यापुढे विरोधी पक्षांची दैना झाली होती. विरोधी पक्षाला ना अजेंडा सापडत होता, ना एकजुटीचा मार्गही.
डॉ. राममनोहर लोहिया म्हणत, ‘जिंदा कौमें पांच साल इंतजार नहीं करतीं...’ या वेळी दहा वर्षांचा इंतजार करावा लागला. लोहियांना अपेक्षित असलेला विरोधी पक्ष ना संसदेत दिसत होता, ना सडकेवर. विरोधी पक्ष मजबूत नसेल तर अधिनायकवादाला मजबूती मिळते, याचा इशारा खुद्द पंडित नेहरूंनी ते प्रधानमंत्री असतानाच दिला होता.
ती निर्नायकी अवस्था या निकालाने संपुष्टात आली. भाजपने ज्यांना पप्पू ठरवलं होतं त्या राहुल गांधींचा एक मजबूत विरोधी पक्षनेता म्हणून उदय झाला आहे.
महाराष्ट्रात महाविकास आघाडीने जोरदार कामगिरी केली. अपेक्षेप्रमाणे ३० (सांगलीसह ३१) जागा मिळवल्या. शिवसेना (उबाठा), राष्ट्रवादी(शप) आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी प्रचंड मेहनत घेतली. राजकीय शहाणपण दाखवलं. त्याचं यश त्यांच्या पदरात पडलं. सर्वाधिक जागा काँग्रेसला मिळाल्या असल्या तरी महाराष्ट्रातील या निकालाचे खरे शिल्पकार आहेत शरद पवार. सगळ्यात कमी जागा त्यांनी घेतल्या. पण जिंकण्याचा सर्वाधिक स्ट्राइक रेट त्यांचा आहे. कोल्हापूरच्या शाहू छत्रपतींना काँग्रेसच्या तिकिटावर उतरवण्यापासून प्रत्येक गणितात त्यांनी लक्ष घातलं.
उद्धव ठाकरेंना असलेल्या सहानुभूतीला मर्यादा पडलेल्या दिसल्या. पण शरद पवारांच्या सहानुभूतीबरोबर त्यांच्या रणनीतीचा मोठा विजय झाला. हे या निकालाचे आणखी एक वैशिष्ट्य.
महाराष्ट्रातील हिंदुत्ववादी राजकारणाचा जोर ओसरला असला तरी ते राजकारण संपलेलं आहे, असं गृहीत धरणं भाबडेपणाचं ठरेल. काँग्रेसचे पारंपरिक मतदार असलेले दलित, मुस्लीम आणि मराठा यांनी शिवसेनेला भरभरून मतदान केलं. पण शिवसेनेचा जो पारंपरिक मतदार आहे, तो मात्र काँग्रेस-राष्ट्रवादीकडे फारसा सरकला नाही. एकनाथ शिंदेंनी केवळ पक्षात नाही तर शिवसेनेच्या पारंपरिक मतदारांमध्येही फूट पाडली. त्याचा फटका खुद्द उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेलाही बसला. हे या निकालाचं अनपेक्षित असलं तरी आणखी एक वैशिष्ट्य आहे.
मतांच्या टक्केवारीचा हिशोब केला तर महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यातलं अंतर फक्त अर्ध्या टक्क्याचं आहे. लोकसभेची गणितं आणि विधानसभेची गणितं वेगळी असतात. त्यामुळे लोकसभेचं चित्र विधानसभेत कायम राहील असं नाही. भाजपसोबत
२५ वर्षं असलेली शिवसेना महाविकास आघाडीसोबत येऊनही आघाडीच्या मतांमध्ये फक्त अर्ध्या टक्क्याची भर पडली आहे. किंवा भाजपच्या मतांमध्ये अर्ध्या टक्क्याची घट झाली आहे. हा अर्धा टक्का काय इशारा देतो आहे? विधानसभेचे संभाव्य निकाल या अर्ध्या टक्क्याच्या पोटात दडलेले आहेत.

[email protected]

01/05/2024

मुक्तशब्द @१४वर्ष

मुक्तशब्द मासिक चौदावं वर्ष पूर्ण करून आज पंधराव्या वर्षांत पदार्पण करत आहे. मराठीतील मासिकांचं एकूण आयुष्यमान पाहता हा कालखंड बराच मोठा आहे. मुक्तशब्दने उपलब्ध परिस्थितीत जोपासता येईल तेवढा दृष्टीचा खुलेपणा जाणीवपूर्वक स्वीकारला. पण त्याचबरोबर पारंपरिकतेची जुनाट मडकी फोडू पाहणारा समाज व संस्कृतीविषयीचा चिकित्सक दृष्टिकोण नजरेआड होणार नाही याचीही काळजी घेतली. लिहिणाऱ्या वाचणाऱ्यांच्या.... ज्यांत आम्हीही आलो... मर्यादांच्या कक्षेत मुक्तशब्दला काम करावे लागते. पण या कक्षा विस्तारण्याचा प्रयत्नही आम्ही केला. सर्जनशील साहित्याचे धुमारे मुक्तशब्दमधून अवतरू दिले व त्याचबरोबर वैचारिक जागरणाची जबाबदारी पेलण्याचाही प्रयत्न केला. आर्थिक दृष्टिकोणातून स्वावलंबी होण्याचे प्रयत्न केले पण बहुधा नेहमीच पदरमोड करावी लागली. मुक्तशब्दचा हा चौदा वर्षांचा थोडक्यात इतिहास आहे. त्याचं भविष्य अस्तित्वात येण्यासाठी लिहिणाऱ्यावाचणाऱ्यांच्या सर्जनशील पाठिंब्याची गरज आहे. तो मिळाला तर आणखी एखादा काळाचा मोठा तुकडा मुक्तशब्द आपलासा करील.

अभिनंदन डॉ. आनंद तेलतुंबडे🌹कर्नाटक सरकारचा साहित्य, आणि सामाजिक न्याय या क्षेत्रात अद्वितीय कामगिरी करणाऱ्या व्यक्ती आणि...
30/01/2024

अभिनंदन डॉ. आनंद तेलतुंबडे🌹

कर्नाटक सरकारचा साहित्य, आणि सामाजिक न्याय या क्षेत्रात अद्वितीय कामगिरी करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांना जगज्योती बसवेश्वर यांच्या नावाने दिला जाणारा ‘बसवा राष्ट्रीय पुरस्कार’ पुरस्कार डॉ. आनंद तेलतुंबडे यांना जाहीर करण्यात आला आहे.
या पुरस्कारामध्ये दहा लाख रुपये पुरस्काराची रक्कम, स्मृतीचिन्ह, सन्मानपत्र, शाल व पुष्पहार.
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिदधरामय्या यांच्या उपस्थित उद्या
31.01.2024 रोजी सायंकाळी 6.00 वाजता रविद्र कलाक्षेत्र, जे.सी.रोड, बंगलोर येथे प्रदान करण्यात येणार आहे!

मुक्त शब्द,फेब्रुवारी 2024
29/01/2024

मुक्त शब्द,फेब्रुवारी 2024

मुक्त शब्द,जानेवारी2024संपादकीय - २भारतीय राज्यघटना : एक राजकीय दस्तावेज की पवित्र पुस्तक?  - केशव वाघमारेभारतीय संविधान...
19/01/2024

मुक्त शब्द,जानेवारी2024
संपादकीय - २
भारतीय राज्यघटना :
एक राजकीय दस्तावेज की पवित्र पुस्तक?
- केशव वाघमारे

भारतीय संविधानाच्या निर्मितीला येत्या २६ नोव्हेंबर रोजी ७४ वर्षं पूर्ण झाली आहेत, म्हणजे तेव्हापासून आपल्या राज्यघटनेचं अमृतमहोत्सवी वर्ष सुरू होईल. अशा वेळी वास्तविक डॉ. आंबेडकरांचा राज्यघटनेमागचा विचार पुढे घेऊन जाण्याच्या दृष्टीने काय करता येईल त्याचा विचार व्हायला हवा. परंतु, या संदर्भात सध्याच्या सत्ताधाऱ्यांचा आशीर्वाद असलेल्या काही जणांचे प्रयत्न चक्र पूर्णतः उलट दिशेनं नेण्याचे असल्याचं दिसून येतं. असं का व्हावं? राज्यघटनेच्या वारशाला बोल लावण्याची सुरुवात हल्ली झाली आहे, ती का व्हावी? यासाठी राज्यघटनेकडे पाहण्याच्या दृष्टिकोनांतला फरक समजून घेतला पाहिजे. त्या फरकामुळे संविधानाचं – पर्यायानं देशाचं - काय नुकसान होऊ शकतं हेही समजून घेतलं पाहिजे. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे - संघ परिवार त्याच्या वैचारिक समर्थकांचा - कलुषित दृष्टिकोन पुढे रेटला जातो आहे. याचा ढळढळीत पुरावा ठरतो तो संविधानाच्या मूलभूत रचनेतही बदल करण्याची मागणी सूचकपणे करणारा एक लेख.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अर्थ सल्लागार बिबेक देबराॅय यांनी नुकताच भारतीय राज्यघटनेसंदर्भात एका इंग्रजी दैनिकात लेख लिहून असे मत मांडले की, भारतीय राज्यघटना २०४७पर्यंत बदलण्याची आवश्यकता आहे. १९५०मध्ये आम्हाला ज्या घटनेचा वारसा मिळाला होता तो आता आमच्याकडे नाही. त्यात अनेकवेळा सुधारणा करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे ती अक्षयी चांगल्यासाठी ठरत नाही. त्यांनी पुढे असेही म्हटले आहे की, “असे असूनही १९७३पासून आम्हाला सांगण्यात आले आहे की, सरकारला इच्छा असली तरीही, सरकारला राज्यघटनेची ‘मूलभूत रचना’ बदलता येणार नाही; ‘लॉ ऑफ शिकागो लॉ स्कूल’ने लिखित विविध संविधानांचा क्रॉस-कंट्री अभ्यास केला आणि त्यांचे सरासरी आयुर्मान फक्त १७ वर्षे असल्याचे त्या अभ्यासातून त्यांना आढळले. भारतीय राज्यघटनेला ७३ वर्षे पूर्ण झाली आहेत. आपली सध्याची राज्यघटना मुख्यत्वे १९३५च्या भारत सरकारच्या कायद्यावर (‘गव्हर्न्मेंट ऑफ इंडिया अॅक्ट, १९३५’वर) आधारित आहे. त्या अर्थाने तिला स्वातंत्र्यपूर्व वसाहतकालीन वारसाही आहे. त्यामुळे २०४७ साठी भारताला नव्या घटनेची गरज आहे.”

डॉ. आंबेडकरांची भूमिका
वस्तुस्थिती अशी आहे की, भारतीय राज्यघटनेच्या निर्मितीपासूनच भारतीय राज्यघटनेबद्दल या देशांमध्ये वेगवेगळ्या पक्ष संघटना आणि जात-वर्ग समूहांकडून वेगवेगळे दृष्टिकोन मांडले जात होते. आपल्या विचाराचं, आपल्या हितसंबंधाचं प्रतिबिंब भारतीय राज्यघटनेत यावं असे आग्रह धरले जात होते. १७ डिसेंबर, १९४६च्या ‘घटना समिती’तील भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, “मी हे जाणतो की आज आपण राजकीय, आर्थिक आणि सामाजिक दृष्ट्या विभाजित आहोत. आपण प्रतिस्पर्धी गटांमध्ये विभाजित आहोत आणि मी कदाचित असेही म्हणेन की मीही अशाच एका प्रतिस्पर्धी गटाचा नेता आहे. परंतु महोदय, हे सर्व असूनही जर काळ आणि परिस्थिती अनुकूल झाली, तर या जगातील कोणतीही शक्ती या देशाला एकात्म होण्यापासून प्रतिबंधित करू शकणार नाही, अशी माझी पक्की धारणा आहे. राष्ट्राचे भवितव्य निर्धारित करताना केवळ लोकांची प्रतिष्ठा, नेत्यांची प्रतिष्ठा आणि पक्षाची प्रतिष्ठा या बाबींना कोणतेही मूल्य नसते. देशाचा भवितव्याचा विचार हाच सर्वतोपरी असावा.” यावरून डॉ. आंबेडकरांनी संविधान-समितीमध्ये मांडलेली भूमिका स्पष्ट होते. सामाजिक न्यायासह राष्ट्र उभारण्याला त्यांनी प्राधान्यक्रम दिलेला होता किंवा असेही म्हणता येईल की संविधान सभेत त्यांनी ती भूमिका पार पाडली. परंतु, त्यांच्या भूमिकेला संविधान सभेत बहुमत नसल्याने त्यांना अनेक तडजोडी कराव्या लागल्या. घटना समितीमध्ये घमासान चर्चा घडत होत्या, वाद-विवाद घडत होते. घटना समितीत काँग्रेसचे बहुमत होते, परंतु, डॉ. आंबेडकर या घटना-समितीत आपल्या समूहाचंही एक प्रतिनिधित्व करत होते.
डॉ. आंबेडकरांच्या पूर्वीही दलितांवर अन्याय होत होते, त्यांच्या हयातीतही ते होत होते आणि आजही होत आहेत. त्यांच्या वस्त्या जाळल्या जात आहेत; त्यांच्या स्त्रियांची विटंबना केली जाते, त्यांना जिवे जाळले जाते. असे अपराध करणाऱ्यांना शिक्षा होत नाहीत. आजही दलितांना माणुसकीने वागवले जात नसल्याच्या घटना मोठ्या प्रमाणावर होत आहेत. १९२७ सालच्या ‘चवदार तळ्याच्या सत्याग्रहा’पासून सुरू झालेला संघर्ष पुढे नेताना घटनेतील मूलभूत हक्कांचा आधार घेऊनच लढता येईल, याची जाणीव डॉ. आंबेडकरांना होती. वसाहती कालखंडात डॉ. आंबेडकर दलितांच्या न्याय्य हक्कांसाठी लढत असताना ब्रिटिशांकडून काही सुधारणा आणल्या जात होत्या. डॉ. आंबेडकर त्यामध्येही दलितांसाठी न्याय्य हक्क मागत होते. अशा न्याय्य हक्कांना घटनात्मक आधार असावा म्हणून त्यांनी ‘गोलमेज परिषद’, ‘सायमन कमिशन’, ‘क्रिप्स मिशन’ यांमध्ये दलितांच्या प्रतिनिधित्वाची व न्याय्य हक्कांची सतत मागणी केली होती. ज्यात आम्ही समान भागीदार नाही, अशी कोणतीही राज्यघटना मला मान्य असणार नाही, असेही त्यांनी मुंबई विधिमंडळातील चर्चेदरम्यान ठणकावून सांगितले होते. एकूणच घटना समितीत त्यांचा जाण्याचा प्रमुख उद्देश हा दलितांचे न्याय्य हक्क सुरक्षित ठेवणं हाच होता. ती एक राजकीय लढाई होती.

‘कॅबिनेट मिशन’ आणि संविधान सभेची स्थापना
१९४५मध्ये दुसरे महायुद्ध संपुष्टात आले आणि भारताच्या स्वातंत्र्याच्या प्रश्नाला प्राधान्य प्राप्त झाले. या प्रश्नाबाबत विचारविनिमय करण्यासाठी ब्रिटिश शासनाने एक त्रि-सदस्यीय शिष्टमंडळ भारतात पाठवले. हे शिष्टमंडळ सत्ताहस्तांतरणाच्या निर्विघ्न मार्गपद्धती प्रक्रिया आणि साधने सुचविण्याच्या हेतूने भारतात पाठवण्यात आले होते. या शिष्टमंडळाला ‘कॅबिनेट मिशन’ असे संबोधण्यात आले होते. या ‘कॅबिनेट मिशन’ने १६ मार्च, १९४६ रोजी सत्ताहस्तांतरणाची आपली योजना घोषित केली. भारताचा भावी राज्यकारभार चालवण्याच्या दृष्टीने संविधाननिर्मितीसाठी एक संविधान सभा स्थापन करण्यात यावी, असे या योजनेत सूचित करण्यात आले होते. या प्रस्तावानुसार संविधान सभेच्या स्थापनेसाठी निवडणुका घेण्यात आल्या. संविधान सभेवर सदस्यांची नियुक्ती प्रांतीय विधान मंडळाच्या निर्वाचित सदस्याद्वारे करण्यात आले. काँग्रेसच्या विरोधामुळे डॉ. आंबेडकर मुंबई विधान मंडळातून निर्वाचित होऊ शकले नाहीत. तेव्हा भावी राज्यघटनेत दलितांचे हित सुरक्षित राहावे याकरता घटना समितीला ‘ऑल इंडिया शेड्युल कास्ट फेडरेशनच्या वतीने निवेदन देण्याचा निर्णय एका बैठकीत घेण्यात आला. हे निवेदन तयार करण्याची जबाबदारी डॉ. आंबेडकर यांच्यावर सोपवण्यात आली. त्यानुसार २४ मार्च, १९४७ रोजी डॉ. आंबेडकरांनी घटना समितीला सादर केलेले हेच निवेदन ‘राज्यसंस्था आणि अल्पसंख्याक समाज’ (‘स्टेट अँड मायनॉरिटीज’) या नावाने प्रकाशित करून मोठ्या प्रमाणात वितरित करण्यात आले. डॉ.आंबेडकरांनी हे निवेदन कोणाच्याही हस्तक्षेपाशिवाय राज्यघटनेच्या स्वरूपात तयार केले असल्याने दलितांसाठी तेच डॉ. आंबेडकरांचे खरे संविधानशिल्प होते.

डॉ. आंबेडकरांची राज्य समाजवादाची संकल्पना
‘स्टेट अँड मायनॉरिटीज’मध्ये न्यायिक संरक्षण, विषम व्यवहाराविरुद्ध संरक्षण, भेदभावाविरुद्ध संरक्षण, आर्थिक शोषणाविरुद्ध संरक्षण इत्यादी बाबतींत महत्त्वाचे अनुच्छेद त्यात होते. शिवाय दलितांना स्वतंत्र वसाहती, संघ व प्रांतीय विधिमंडळामध्ये प्रतिनिधित्व, स्वतंत्र मतदारसंघ अल्पसंख्याकांचे संरक्षण इत्यादी संबंधीच्या तरतुदी स्पष्टीकरणासह नियोजित केल्या होत्या.
डॉ. आंबेडकरांनी त्यांची राज्य समाजवादाची संकल्पना यात विस्ताराने मांडली आहे. आधारभूत उद्योगाचे संचालन व मालकी सरकारची असेल; प्रधान उद्योगांचे संचालन व मालकी सरकार किंवा सरकारी महामंडळाची असेल; विमा उद्योगावर सरकारची मक्तेदारी असेल आणि प्रत्येक प्रौढ व्यक्तीस तिच्या उत्पन्नाच्या प्रमाणात विमा भरणे बंधनकारक असेल अशाही तरतुदी त्यात केल्या होत्या.
यांतील अतिशय महत्त्वाची बाब अशी की, शेतजमिनीवर सरकारची मालकी असेल; सामूहिक पद्धतीने शेती केली जाईल ती सरकारच्या नियम व निर्देशानुसार केली जाईल; शेतीवर लावलेला प्रभार दिल्यानंतर उरलेले पीक आपसात वाटून घेतले जाईल; शेतीसाठी लागणाऱ्या वस्तूंकरता अर्थसहाय्य करणे सरकारची जबाबदारी असेल अशा राज्य समाजवादाच्या त्यांच्या संकल्पना त्यांनी निवेदनात अंतर्भूत केल्या होत्या. अशा प्रकारच्या न्यायावर आधारित समाजाच्या उभारणीसाठी समाजवादी अर्थव्यवस्थेची स्पष्ट तरतूद राज्यघटनेत असल्याशिवाय न्यायाचा उदोउदो केवळ कल्पनाविलास ठरेल. काँग्रेसच्या विरोधानंतर जोगेंद्रनाथ मंडलांच्या मदतीने डॉक्टर आंबेडकर बंगाल प्रांतातून संविधान सभेवर निवडून गेले. तेव्हा घटना समितीच्या पहिल्याच सभेत भाषण करताना डॉ. आंबेडकर ‘नेहरू अहवाला’वर बोलताना म्हणाले, “नेहरूंच्या प्रस्तावात मला काही उणिवा जाणवतात. मला असे वाटते की, या प्रस्तावात जरी काही अधिकारांची घोषणा करण्यात आलेली असली, तरी त्यांच्या सुरक्षिततेसंबंधी उपयोजना केल्याशिवाय अधिकारांना काहीही मोल नसते. कारण लोकांच्या अधिकाराचे हनन होते. त्यामुळे या प्राधान्याच्या आधारावरच लोक त्याविरुद्ध दाद मागू शकतात. राज्याला आर्थिक सामाजिक आणि राजकीय न्यायाची तत्त्वे व संकल्पना वास्तवात आणता याव्या, यासाठी या प्रस्तावात काही प्राधान्य त्यांच्याकडून प्रस्तावित केली जातील. म्हणूनच या दृष्टिकोनातून मला अपेक्षित होते की, या देशात सामाजिक आणि आर्थिक न्यायाच्या प्रस्थापनेसाठी शेती आणि उद्योगाचे राष्ट्रीयीकरण केले जाईल, असे स्पष्टपणे या प्रस्तावात नमूद केलेले असेल. भावी शासन या देशात सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्यायाची प्रस्थापना करू इच्छिते. परंतु, या देशातील अर्थव्यवस्था ही समाजवादी अर्थव्यवस्था असणार नाही, तोवर शासनाला हे कसे शक्य होईल, ते मला कळत नाही.”

सैद्धांतिक तडजोडीबाबत विषाद
‘शेड्यूल कास्ट फेडरेशन’मार्फत घटना समितीला राज्य समाजवादाचा प्रस्ताव आंबेडकरांनी सादर केला होता. परंतु, ते घटना समितीत गेल्यानंतर ‘शेड्यूल कास्ट फेडरेशन’चा तो प्रस्ताव त्यांना स्वतःच भारतीय राज्यघटनेमध्ये अंतर्भूत करता आला नाही. एका अर्थाने ही त्यांची सैद्धांतिक तडजोड होती. घटना समितीत जाण्यापूर्वी काही काळ आधीच त्यांनी राजकीय एकाकी पणाची कडवट अवस्था अनुभवली होती आणि त्यांचे आयुष्यभराचे मिशन कुठल्याही अपेक्षित निकालाशिवाय संपुष्टात येत चालल्याचे त्यांना जवळून जाणवत होते. त्यांना घटना समितीमध्ये जाण्याची आणि राज्यघटनेने स्वतःच्या लोकांसाठी विशिष्ट सवलती समाविष्ट करण्याची आत्यंतिक गरज वाटत होती. काँग्रेसने जेव्हा त्यांना घटना समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी दिली, तेव्हा त्यांनी जीवनभर पाहिलेल्या स्वप्नांचा बळी देऊनच ती स्वीकारली. कारण, आपल्या लोकांकरता काहीतरी मिळवण्याचा त्यांचा हेतू घटनेतल्या तरतुदीनेच सफल होऊ शकत होता आणि तेवढेच त्यांना शक्य होते. खासगी संपत्तीच्या हक्काचा मूलभूत हक्कांमध्ये समावेश करण्यास त्यांचा विरोध होता. ‘स्टेट अँड मायनॉरिटीज’मध्ये त्यांनी उत्पादनाची साधने राज्याच्या मालकीची असावी या भूमिकेचा पुरस्कार केलेला होता. हे उदारमतवादी लोकशाहीच्या तत्त्वांच्या विरोधात होते. सामाजिक लोकशाहीचे तत्त्व त्यांना प्राणभूत होते, परंतु, तेही त्यांना घटनेच्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये टाकावे लागले; अर्थात तसे केल्याने त्यातून अपेक्षित तो परिणाम साधला जाणार नव्हता. जी संसदीय कार्यप्रणाली पूर्वाश्रमीच्या दलितांचे आयुष्य व तंत्राला धोकादायक ठरेल असे त्यांना वाटत होते, तिचाच विचार त्यांना करावा लागला.
दलित आणि इतर दडपलेल्या जनतेचा या घटनेमुळे आरक्षणाशिवाय दुसरा कोणताही भौतिक फायदा होणार नाही याची त्यांना निश्चितच जाणीव होती. याउलट घटनेने दलित आणि दडपलेल्या लोकांना आरक्षण व घटनात्मक संरक्षणाचे मृगजळ दाखवून सत्तेचे सर्व फायदे श्रीमंत आणि पारंपरिक अभिजन वर्गाला मिळतील अशीच व्यवस्था केली होती. म्हणून २५ नोव्हेंबर, १९४९ रोजी घटना समितीमध्ये घटनेवर भाष्य करताना ते म्हणतात, “या देशात जोपर्यंत हजारो राष्ट्रविरोधी जाती अस्तित्वात आहेत, तोपर्यंत भारताला राष्ट्र ही संज्ञा कशी देता येईल? आर्थिक सामाजिक क्षेत्रात योग्य वेळी समानता आणली गेली नाही, तर शोषित जनसमूह राजकीय लोकशाहीचा डोलारा उधळून लावेल,” असा सुपरिचित इशारा त्यांना तेव्हा द्यावा लागला.
भारतीय राज्यघटना ही डॉ. आंबेडकरांच्या संघर्षातील अपेक्षांचे, न्याय्य हक्काचे एक राजकीय दस्तावेज आहे. बाबासाहेबांना अभिप्रेत असणारी लोकशाही आणि सध्याच्या राज्यघटनेने उभा केलेला लोकशाहीचा सांगाडा हे एक नव्हे. बाबासाहेबांना अभिप्रेत असणाऱ्या लोकशाहीत ‘एक व्यक्ती एक मूल्य’ हा मूलभूत विचार आहे, तर आपल्या राज्यघटनेत केवळ ‘एक व्यक्ती एक मत’ हा देखावा आहे.

संविधान : पवित्र ग्रंथागत
डॉ. आंबेडकरांनंतर त्याच्या अनुयायांनी मात्र राज्यघटनेला राजकीय संघर्षाचा दस्तावेज न समजता त्याला दलितांसाठी एक पवित्र पुस्तक बनवून टाकले! डॉ. आंबेडकरांच्या निर्वाणानंतर दादासाहेब गायकवाड यांनी जेव्हा जमिनीचे आंदोलन सुरू केले, तेव्हा संविधानिक मूल्याचा दाखला देत त्यांच्या भूमिहीन जमिनीच्या आंदोलनाला अराजकाचे व्याकरण ठरवले गेले. ‘संविधानामधल्या समता, स्वातंत्र्य, बंधुत्व आणि न्याय या मूल्यांना समाजवादी अर्थव्यवस्थेशिवाय कसलाही अर्थ नाही’ या डॉ. आंबेडकर यांच्या इशाऱ्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले गेले.
दलितांच्या राजकीय संघर्षाचाच दस्तावेज असलेल्या संविधानाचा दलित नेत्यांकडून कायमच असा विपरीत अर्थ लावण्याचा प्रयत्न झाला. त्यांनी संविधानाला राजकीय दस्तावेज न समजता जणू डॉक्टर आंबेडकरांनी निर्माण केलेले ते एक पवित्र पुस्तक आहे, असे मानले. देशाची घटना तयार करणे हे एका व्यक्तीचे काम नसते. ती कशी तयार केली जाते याची कल्पना नसलेले लोक वस्तुस्थिती लक्षात न घेता केवळ भावनिक गदारोळ माजवतात. या विभूतीपूजक भावनिक गदारोळामुळे दलितांची क्रांतिकारी जाणीवच कमी झाली. डॉ. आंबेडकर म्हणजे संविधानाचे एकमेव शिल्पकार ही प्रतिमा व्यवस्थेला तडा जाण्यापासून वाचवते, तर दुसरीकडे शोषणावर आधारित व्यवस्था नाकारून समतेवर आधारित व्यवस्था निर्माण करण्याची ऐतिहासिक जबाबदारी पार पाडू शकणाऱ्या सामान्य जनतेला मानसिक द्वंदामध्ये अडकवते. डॉ. आंबेडकरांनी निर्माण केलेले संविधान म्हणजे एक पवित्र पुस्तक; त्यामुळे त्याची कोणती चिकित्सा होऊ शकत नाही अशा भावभोळ्या मानसिकतेत दलित जनता अडकून बसली.

राज्यघटनेकडे बघण्याचे तीन दृष्टिकोन
भारतीय राज्यघटनेकडे बघण्याचे मुख्य तीन दृष्टिकोन आहेत. आंबेडकरी समूह भारतीय राज्यघटनेकडे भिमाची (डॉ. भीमराव आंबेडकर यांची)लेखणी, कायदा भिमाचा, भारतीय राज्यघटनेचे एकमेव शिल्पकार अशा भक्तिभावाने बघतात, तर संघपरिवार त्याकडे कसा पाहतो – ‘भारतीय राज्यघटनेत भारतीय काय आहे? ती वेगवेगळ्या देशांच्या राज्यघटनेची मिळून बनवलेली एकत्रित गोधडी आहे’ अशा कुत्सित पद्धतीने भारतीय राज्यघटनेकडे बघतो. भारतीय राज्यघटना निर्मितीच्या प्रक्रियेवर आणि त्यानंतरही संघ परिवाराने भारतीय राज्यघटनेबद्दल आपला द्वेष कायम जाहीरपणे बोलून दाखवला आहे.
शंकर सुब्ब अय्यर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुखपत्र ‘ऑर्गनायझर’मध्ये ‘मनू आमच्या हृदयावर राज्य करतो,’ असा लेख लिहून भारतीय राज्यघटनेपेक्षा मनुचा कायदा श्रेष्ठ आहे असे सांगण्याचा प्रयत्न केला होता.
सरसंचालक गोळवलकर यांनी मनू जगातील पहिला कायदेतज्ज्ञ आहे आणि त्याच्याकडून भारतीय राज्यघटनेने काहीच घेतले नाही; भारतीय राज्यघटना ‘मनू’कडे साफ दुर्लक्ष करते आहे आणि या संविधानात भारतीय काहीच नाही, अशा पद्धतीचे दुःख व्यक्त केले होते. कम्युनिस्ट पक्षांचेही काही दृष्टिकोन भारतीय राज्यघटनेबद्दल आहेत; त्यांच्या दृष्टिकोनानुसार ही राज्यघटना व्यापक उदारमतवादी लोकशाही स्वरूपाची असल्याचे सांगितले जात असले तरी तिच्यामध्ये भारतातल्या प्रस्थापित भांडवली जमीनदारांचे व त्यांच्या परंपरेचे रक्षण करणाऱ्या वर्गाचे प्रतिबिंब पडले आहे. त्यांचे हितसंबंध सुरक्षित ठेवले गेलेले आहेत. तसेच तिच्यामध्ये समाजात मूलभूत आणि रचनात्मक बदल करणाऱ्या कुठल्याच तरतुदी करण्यात आल्या नाहीत. या अशा पार्श्वभूमीवर, डॉ.आंबेडकरांचा भारतीय राज्यघटनेबद्दलचा दृष्टिकोन समजून घेतला पाहिजे.
देशाच्या भवितव्यासाठी राज्यघटनेत काय अंतर्भूत असावे? समता, स्वातंत्र्य, बंधुत्व आणि न्याय याबरोबरच हजारो वर्षांपासून या देशात शोषित असलेल्या समूहाला सामाजिक न्याय कसा देता येईल, तो सामाजिक न्याय प्रस्थापित करण्यासाठी कोणती अर्थ-राजकीय व्यवस्था असावी, याबाबत त्यांनी सर्वतोपरी प्रयत्न केले. परंतु, भारतीय राज्यघटना ज्या वर्गाच्या हातात होती त्या वर्गाने भारतीय राज्यघटनेचे नाव घेतच भारतीय राज्यघटनेतील मूल्यांना हरताळ फासण्याचा कायम प्रयत्न केला. भारतीय राज्यघटना अनुच्छेद ४६ नुसार दलितांना काही आश्वासन देते

आर्टिकल ४६ अनुसार
“The state shall promote with special care, the educational and economic interests of the weaker section of the people and particular of the Schedule Caste and Schedule Tribes and shall protect them from social injustice and all forms of exploitation.” भारतीय राज्यघटनेत असलेल्या या आणि अशाच अभिवचनांचे गेल्या ७० वर्षांत काय झाले? ती कितपत पाळली गेली? त्याची किती पूर्तता झाली?” अशा प्रश्नांची उत्तरे शोधली, तर एक ढळढळीत अपयश आपल्यासमोर उभे राहते. राज्यघटना व्यापक आणि सर्वसमावेशक असली तरी या राज्यघटनेतील तरतुदींची अंमलबजावणी करायची नाही, असेच शासक वर्गाने ठरवलेले आहे. केवळ राज्यघटनेत कायद्यात तरतुदी असून चालत नाही किंवा नुसते ठराव करून चालत नाही. ही न्यायव्यवस्था, नोकरशाही प्रशासन त्याची अंमलबजावणी करीत नसतील तर त्या तरतुदींना काही अर्थ राहणार नाही. दलित विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठी पैसे नाहीत म्हणणाऱ्या मोदी सरकारने ‘टाटा’ला तीस हजार कोटींचा फायदा होईल अशा सवलती दिलेल्या आहेत भांडवली व्यवस्था कुठल्याही कालखंडातील असो व कुठल्याही स्वरूपाची असो, शासन ही भांडवली व्यवस्थेचे रक्षण व समग्र व्यवस्थापन करणारी राजकीय व्यवस्था असते. जगात ‘इंडस्ट्रियल स्टेट’ची जागा आता शिकारी शासनाने घेतली असून हे शिकारी शासन म्हणजेच जनतेचे सार्वजनिक हित आणि कल्याण या कल्पनेलाच विरोध करणारी अशी एक अभद्र युती आहे. भारतीय शासकवर्ग राज्यघटनेचा मुखवटा धारण करून वावरत असला, तरी प्रत्यक्षात राज्यघटना शासक वर्गाच्या हातातले साधन बनले आहे. शासक वर्ग संविधानाला वापरून घेत आहे आणि दलित वर्ग मात्र संविधानिक मूल्याचे भावनिक ओझे आपल्या डोक्यावर वाहत आहे. संविधान म्हणजे भावनिक ओझे अथवा पवित्र पुस्तक नसून जनलढ्यातून निर्माण झालेल्या जनआकांक्षांचे प्रतिबिंब आहे. त्यामुळेच ‘एनआरसी सीएए’ विरोधी आंदोलनं, शेतकरी आंदोलन, आदिवासी आंदोलन त्यायोगे उभी राहिली. आज अनेक जनसमूह संविधानाचा आधार घेऊन लढत आहेत आणि संविधान त्यांच्यासाठी लढण्यासाठी नैतिक आधार पुरवत आहे. उदाहरणार्थ, मुस्लीम, दलित, ख्रिश्चन अल्पसंख्याक, शेतकरी, मजूर यांना जोडणारा संविधान हा दुवा आहे.
‘फेडरल स्टेट’ची संकल्पना अंशतः मान्य करून आपले अनेक घटकराज्ये मिळून निर्माण झालेले भारतीय प्रजासत्ताक १९५०मध्ये अस्तित्वात आले. सत्ता केंद्राकडे एकवटू नये, यासाठी अनेक घटकराज्यांचे मिळून आपले एक प्रजासत्ताक घटकराज्य अर्थात, .‘फेडरल रिपब्लिक’ अस्तित्वात आले. परंतु, सत्तेचं काही प्रमाणात विकेंद्रीकरण करू पाहणाऱ्या संविधानाच्या तत्त्वांशी प्रतारणा करून सत्ता पूर्णतः केंद्र सरकारकडे एकवटण्याचे प्रयत्न आज जोरात आहेत. त्या विरोधात काही विरोधी पक्ष आवाज उठवून ते प्रयत्न उधळून लावू पाहात आहेत. संविधानाच्या अंमलबजावणीकडे सुजाणपणे पाहणे गरजेचे
असे प्रयत्न अधिक उन्नत, अधिक लोकाभिमुख करायला हवेत. तसे करणे म्हणजे लिखित संविधानाशी प्रतारणा नसून उलट बाबासाहेबांच्याउद्देशांना वास्तवात आणण्याचे ऐतिहासिक कार्य ठरू शकते. आपल्याला जातीयवाद्यांचा आणि धर्मवाद्यांचा धोका ओळखून त्यांचा डाव उलटून लावायचा असेल, तर आपण संविधान व संविधाननिर्मितीच्या प्रक्रियेकडे आणि तिच्या प्रामाणिक अंमलबजावणीकडे अधिक सुजाण पद्धतीने बघितले पाहिजे. मुक्तिदायी राजकारणासाठी डोळसपणाने केलेली चिकित्सा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व उजव्या शक्तीने धूर्त आणि कुटिलपणे संविधान बदलू पाहण्यासाठी केलेली चिकित्सा यांमध्ये आपण फरक करायला शिकले पाहिजे.
- केशव वाघमारे
मोबाइल : ७७४४८०८२५७

मुक्त शब्द,जानेवारी 2024संपादकीय - 1मल्टिपल आयडेंटिटीवाल्या बाहुल्यांचे प्रकरण- हरिश्चंद्र थोरात २०१४ सालाच्या आसपास आम्...
19/01/2024

मुक्त शब्द,जानेवारी 2024
संपादकीय - 1

मल्टिपल आयडेंटिटीवाल्या बाहुल्यांचे प्रकरण

- हरिश्चंद्र थोरात

२०१४ सालाच्या आसपास आम्ही फेसबुकावर अर्थपूर्ण ठरू शकणाऱ्या व्यवहाराचा प्रयत्न करत असू. आताही करतो. पण आता वातावरण बदलले आहे. तेव्हा टाकलेल्या पोस्टवर बऱ्या चर्चा होत. ट्रोल्सची संख्या फारशी नसे. कुठलाही युक्तिवाद न करता लिहिणाऱ्याला निकालात काढण्याचे राजकारण सहसा होत नसे. गंभीर विवेचन करणाऱ्या पोस्ट्स फारशा लोकप्रिय होत नसत. पण असं गंभीर, अकादमिक संभाषित इथं लिहायचं नसतं असे फतवे काढले जात नसत. प्रयोग करायला वाव असे. आपल्या नेहमीच्या, सरावाच्या लेखनापेक्षा काही वेगळे करून पाहिले जात नसे. आपली नेहमीची ओळख दडवून काही लिहिणारे बिनविषारी, सहृदय, मार्मिक, मजेदार आणि तरीही गंभीर लिहीत असत. असं एकूण वातावरण असताना आम्ही ‘मल्टिपल आयडेंटिटीवाला बाहुला’ या शीर्षकाखाली दहा छोटेखानी पोस्टींची एक मालिका फेसबुकावर लिहिली होती. कल्पितकथेच्या स्वरूपावर भाष्य करण्याचा हा एक कल्पितकथात्मक प्रयत्न होता. काही मोजक्या लोकांना ही मालिका आवडली होती. तिच्यात विस्ताराच्या क्षमता जाणवत होत्या. नंतरही त्या सतत जाणवत राहिल्या. अधूनमधून हा मल्टिपल आयडेंटिटीवाला बाहुला आमच्या स्वप्नात येऊन संवाद साधण्याचा प्रयत्नही करीत असे. पुढे काय असं डोळे मिचकावत विचारत असे. त्या मालिकेचा शेवट म्हणजे एक पळवाट आहे, तो खरा शेवट नाही, हे कटाक्षाने सांगत असे.
मुक्त शब्दची कथनात्म संपादकीये म्हणून या मालिकेचा विस्तार करावा असे अलीकडे आमच्या मनात पुन्हा पुन्हा येऊ लागले होते. कल्पितकथेचे स्वरूप आणि समकालीन संस्कृतीवरचे भाष्य अशा दोन्ही गोष्टींचा, त्यांच्यातील परस्परसंबंधांचा वेगळ्या पातळीवर जाऊन शोध घ्यावा असे वाटू लागले होते. संपादकीयांच्या रूढ चौकटीत हे लेखन बसणे अवघड आहे, याची जाणीव असूनही मुद्दाम हे साहस करावे अशी इच्छाही मनात जागी होऊ लागली होती.
अर्थातच पुन्हा एकदा नवा प्रारंभ करण्यापूर्वी २०१४च्या शेवटी आम्ही काय मांडणी केली होती, हे वाचणाऱ्यांसमोर येणे गरजेचे वाटते. छापलं गेलेलं पटकन सापडतं. छापणं लिहिलेल्या मजकुराला चिरस्थायी करण्याची यंत्रणा आहे. फेसबुकावर लिहिणं म्हणजे मजकुराचं स्मृतीमध्ये रूपांतर करणं. दहा वर्षांपूर्वीचा मजकूर कोणी वाचणारा क्रमाक्रमाने मागे जात, शोधून काढून वाचील अशी कल्पना करणे थोडे अवघडच वाटते. म्हणूनच या मालिकेचा पहिला भाग म्हणून आम्ही २०१४ सालच्या दहा पोस्टी येथे सादर करतो आहोत.

मल्टिपल आयडेंटिटीवाला बाहुला—१
माझ्याकडे सावंतवाडीवरून आणलेला एक मल्टिपल आयडेंटिटीवाला बाहुला आहे. म्हटला तर एक. पण त्याच्या पोटात एकाखाली एक आणखी पाचसहा बाहुले आहेत. आज सकाळी मी हे बाहुले काढले आणि एकमेकांच्या शेजारी ठेवून दिले. यांत कुठलाही त्रास झाला नाही. पुन्हा ते एकमेकांत बसवले, ठेवून दिले. हेही कुठल्याही त्रासाशिवाय.
हे वास्तव.
एक दिवस या बाहुल्यात प्राण संचरला. एक प्राण की सहा प्राण हे सांगता येणे कठीण आहे. सगळ्यांत आतला भयानक घुसमटू लागला. पाचजणाच्या आत कोंडून राहणे ही गोष्ट अवघडच. आतल्याचा संसर्ग वरच्या सर्वांना झाला. एकमेकांशी घट्ट चिकटलेली आपली त्वचा वेगळी करण्यासाठी सहाहीजण धडपडू लागले. त्यांना वेदना होऊ लागल्या. वेगळे होण्याच्या प्राणांतिक धडपडीत स्व आणि पर यांच्यातील भेद गुंतागुंतीचे होऊ लागले. एकमेकांत संघर्ष होऊ लागले. इतर पाचहीजणांपेक्षा आपले वेगळे जग निर्माण करण्यासाठी सारेजण धडपडू लागले. पण या जगांच्या सीमारेषा एकमेकांना छेदून जात होत्या. त्या वेगळ्या करण्यासाठीची टोकाची धडपड सुरू झाली. आख्खा बाहुला भूकंप व्हावा तसा थरथरू लागला. धडपडू लागला. गडबडा लोळू लागला.
ही कादंबरी.

मल्टिपल आयडेंटिटीवाला बाहुला -- २
दिनानाथ मनोहरांनी धीर दिला तरी माझ्यासमोरचे प्रश्न सुटलेले नाहीत.
या बाहुल्यांच्यामधले आयडेंटिटीविषयीचे प्रश्न मला कादंबरीत आणायचे आहेत. पण ते कसे आणायचे? उदाहरणार्थ, असे करता येईल की हे सहाजण एके ठिकाणी भेटतात आणि आपल्यामधील समस्यांविषयी तात्त्विक पातळीवरील चर्चा करतात. पण असे केले की कादंबरी फार अमूर्त पातळीवर राहते. किंवा असेही करता येईल की या बाहुल्यांना लिहायला लावायचे. पण यामुळे कथन गुंतागुंतीचे झाले तरी जगत्या आयुष्याचा संदर्भ तिला राहणार नाही.
यावर उपाय म्हणजे मला काही विशिष्ट सिच्युएशन्स निर्माण कराव्या लागतील. त्या प्रत्यक्ष जगण्याशी संबंधित असतील आणि आयडेंटिटीच्या आशयसूत्राचा स्पष्ट उल्लेख न करता अप्रत्यक्षपणे त्या आशयसूत्राची गुंतागुंत पुढे आणत राहतील. या साऱ्याचे चित्रण खरे वाटावे असे वाटले पाहिजे. ते कल्पित किंवा अमूर्त वाटता कामा नये.
पण ते खरे आहे असेही वाटता कामा नये. ते वास्तवाचे चित्रण आहे असे वाटायला लागले तर मूळ वास्तवाचा (हे बाहुले आहेत या वास्तवाचा) विसर पडेल. तेव्हा या मूळ वास्तवाला मला फार काळ टाळता येणार नाही.
या द्वंद्वातून कसा मार्ग काढणार, हरिश्चंद्रा तू?

मल्टिपल आयडेंटिटीवाला बाहुला -- ३
माझ्यासमोरचा आणखी एक प्रश्न असा की बाहुल्याला किंवा बाहुल्यांना कोणत्या जगात ठेवायचे?
ऑर्वेलसारखं त्यांच असं वेगळं जग निर्माण करायचं की गुंथर ग्राससारखं या बाहुल्याला-बाहुल्यांना नेहमीच्या वास्तव जगात उतरवायचं? ऑर्वेलसारखं केलं की माझी कादंबरी नेहमीच्या जगावरील एक रूपक म्हणून वाचली जाईल. ते मला नको आहे. ग्राससारखं केलं की माझा बाहुला किंवा बाहुले नेहमीच्या जगातल्या व्यक्ती ठरतील. मग बाहुल्याचं बाहुला असणं फक्त एक गिमिक ठरेल. हेही मला नको आहे.
बाहुल्यात तर प्राण संचरले आहेत. त्याचं असं वेगळं जग उभं करायचं का? पण मग आपल्या भोवतालच्या नेहमीच्या जगाशी त्या जगाचा संबंध कसा आणायचा? हा मोठाच प्रश्न आहे. हा संबंध सहजतेने आणल्यासारखा वाटता कामा नये. एका जगातून दुसऱ्या जगात जाणे लिफ्टने पहिल्या मजल्यावरून दुसऱ्या मजल्यावर जाण्याएवढे सोपे झाले तर दोन जगे असण्याचे गांभीर्यच नाहीसे होईल. हा संबंध ओढूनताणून आणल्यासारखाही वाटता कामा नये. माझ्या कादंबरीची कृत्रिमता त्यामुळे उघडी पडेल.
तेव्हा अशा पॉवरफुल सिच्युएशन्स निर्माण कराव्या लागतील की ज्यामुळे बाहुल्यांचं जग आणि माझं एकमेकांना छेदून जाऊ लागेल. एकमेकांवर आणि एकमेकांमध्ये कोसळू लागेल. या सिच्युएशन्स क्षीण राहिल्या तर सगळंच वरवरचं, सोपं, पोकळ, गिमिकल वाटण्याची शक्यता आहे.
आशयसूत्रांपेक्षाही आशयसूत्रांना रक्त, मांस, चैतन्य देणे इथं जास्त महत्त्वाचं ठरतंय का? आणि हे करताना माझी आशयसूत्रावरची नजरही हटता कामा नये.
कादंबरीकार म्हणून हीच माझी खरी कसोटी आहे काय?

मल्टिपल आयडेंटिटीवाला बाहुला --४
एक महत्त्वाचा प्रश्न राहिलाच. बाहुला एक की बाहुले सहा. सुरुवातीपासून माझ्या मनात याविषयी गोंधळ आहे. बाहुला एकच पण त्याच्या वेगवेगळ्या सहा आयडेंटिटी आहेत असे मानले तर ती मल्टिपल आयडेंटिटीची केस ठरते. बाहुले सहा आहेत पण त्यांच्यामधील भेद नष्ट करून त्यांच्यावर एक आयडेंटिटी लादली गेली आहे असे मानले तर ती अस्मितांच्या सपाटीकरणाची केस ठरते.
दोहोंपैकी कुठल्या तरी एका मार्गाची निवड मला करावी लागेल.
दोहोंपैकी कोणताही मार्ग निवडला तरी अस्मितेचे हे राजकारण का घडते आहे हे मला सांगावे लागेल. सांगावे लागेल की दाखवावे लागेल? दाखवावेच लागेल. नुसते सांगून चालणार नाही. आपण असं समजूया की अस्मितेच्या विघटनाची किंवा अस्मितांच्या सपाटीकरणाची कारणे सामाजिक सांस्कृतिक परिस्थितीत आहेत. तेव्हा या परिस्थितीचे, तिच्या कार्यपद्धतीचे, तिच्या उद्दिष्टांचे, त्यांत अंतर्भूत असलेल्या शोषणाच्या यंत्रणेचे स्वरूप मला स्पष्ट करावे लागेल.
पण मला सामाजिक शास्त्रांमधला एखादा प्रबंध लिहायचा नाही. कादंबरी लिहायची आहे.
मला ही परिस्थिती बाहुल्याच्या-बाहुल्यांच्या कृतींमधून, भोवतालाशी असलेल्या त्याच्या-त्यांच्या संबंधांमधून उभी करावी लागेल. या परिस्थितीच्या पोटात शिरताना लेखक म्हणून माझ्या व्यवहारात भाबडेपणा असता कामा नये. परिस्थितीची व्यामिश्रता आणि सूक्ष्मता मला उभी करता आली नाही तर मला फक्त परिस्थितीच्या विरोधातल्या घोषणा देता येतील.
मला घोषणा द्यायच्या नाहीत. मला कादंबरी लिहायची आहे.
हरिश्चंद्रा, का अवघड करून घेतो आहेस हे सारे?

मल्टिपल आयडेंटिटीवाला बाहुला -- ५
बाहुला अस्वस्थ झाला होता. अपेक्षाभंगाच्या खुणा त्याच्या चेहऱ्यावर दिसू लागल्या होत्या. तो पुटपुटला, तुला घोषणा द्यायच्या नाहीत, कादंबरी लिहायची आहे, हे ठीकच आहे. पण भोवतालच्या परिस्थितीविषयी तुझी अशी काही भूमिका आहे की नाही?
आता काय उत्तर द्यायचे याला? थोडासा विचार करून मी म्हणालो, मराठीतील कादंबरीकाराला बहुधा भूमिका नसतेच हे तुला माहीत असेलच. पण मला भूमिका आहे. ती शंभर टक्के शोषणाच्या, अन्यायाच्या, सत्तेच्या, व्यवस्थेच्या विरोधातली आहे. पण कादंबरीमध्ये या भूमिकेचे सुलभीकरण करणे मला मान्य नाही. मला काळ्यापांढऱ्यामधला ढोबळ संघर्ष रंगवायचा नाही. कारण तो तसा नसतोच. एकदा मी काळ्या-पांढऱ्या रंगाचे दोनच डबे घेतले की परिस्थितीमधल्या सूक्ष्म संघर्षाचे पदर माझ्या नजरेतून निसटू लागतील.
मला वाटले, माझी कणव येऊन तू लिहायला प्रवृत्त झाला आहेस. बाहुला म्हणाला. त्याच्या आवाजातून राग व्यक्त होऊ लागला होता. पण तू तर भलतीकडेच निघाला आहेस. तुझे हेतू साधण्यासाठी तयार केले गेलेले एक साधन, एक बाहुलाच मी झालो आहे की काय, असे मला वाटू लागले आहे.
विश्वासातल्या माणसाकडूनच विश्वासघात झाल्याचे भाव बाहुल्याच्या चेहऱ्यावर अवतरू लागले होते.

मल्टिपल आयडेंटिटीवाला बाहुला -- ६
माझा बाहुला बोलू लागलाय हे लक्षात आलं ना मंडळी? (ही मंडळी कल्पितच बरं का. कारण फेसबुकवरची मंडळी या सिरिजला कधीच कंटाळलीत, ती पळालीयत इथून बहुतेक.)
तर माझ्या बाहुल्याला वाचा फुटलीय. त्याचे विचार तो सुसंगतपणे व्यक्त करू लागलाय. आणि हे विचार चक्क माझ्या विचारांपेक्षा वेगळे आहेत. आता बाहुल्याबाहुल्यांतच नव्हे तर त्याच्यामाझ्यात संघर्ष निर्माण झालाय. हे असं कसं झालं?
काय करू? माझ्या हातातले एक साधन म्हणून त्याला नियंत्रणात ठेवू? की माझे त्याच्यावरचे नियंत्रण काढून घेऊन त्याला हवे ते बोलू करू देऊ? पण मी त्याच्यावरचे नियंत्रण काढून न घेता तो त्याला हवे ते बोलतोयच ना. तो वेगळं बोलतोय की मीच त्याला वेगळं बोलायला लावतोय? मीच त्याचा बोलविता धनी असेल तर माझ्या स्वतःच्या बोलण्याचं काय? माझा बोलविता धनी कोणी वेगळा आहे की काय? मी कुठे आहे मग ? आत की बाहेर? की मीही बाहुलाच आहे एक. कोणाच्या तरी कपाटातला?
तुमच्या लक्षात येतंय ना? नुसते बाहुलेच एकमेकांशी बांधले गेलेले नाहीत. मीही त्यांच्याशी बांधला गेलोय. मलाही स्वातंत्र्य हवंय. कोणाविरुद्ध झगडून मी ते मिळवायचं आहे?
हरिश्चंद्रा, अरे, तूही तुझं स्वातंत्र्य गमावून बसला आहेस.

मल्टिपल आयडेंटिटीवाला बाहुला -- ७
बाहुला बोलतोय. प्रश्न विचारतोय. म्हणतोय माझ्यावर अन्याय होतो आहे. माझं विघटन केलं जातंय. माझं सपाटीकरण केलं जातंय. माझ्या भोवतालची हवा दूषित केली जातेय. मी घुसमटतोय. तू भूमिका घेतोयस ना? मग तू माझ्या बाजूनं बोलायला हवं.
बाहुला मला पेचात टाकतोय. मला त्याचं पटतंय. पण मला जे जाणवतंय, ते अधिक वेगळं आणि म्हटलं तर सूक्ष्म आहे.
बाहुलेभाऊ, हा प्रश्न फक्त माझा किंवा तुझा नाही. तू काय, मी काय, भोवतालच्या परिस्थितीने निर्माण केलेली उत्पादने आहोत. मला तुझ्या माझ्या तात्पुरत्या प्रश्नांत रस नाही. मला हे प्रश्न निर्माण करणाऱ्या व्यवस्थेच्या कासोट्याला हात घालायचा आहे. आणि तुला तर सावंतवाडीच्या एका विश्वकर्म्याने सरळ क्रयवस्तू म्हणून जन्माला घातलंय. ज्या व्यवस्थेने त्याला हे करायला भाग पाडलं त्या व्यवस्थेतच त्याच्या तुझ्या घुसमटीची कारणं शोधली पाहिजेत. समजतंय ना? एकदा व्यवस्था पुढे आली की चांगली व्यक्ती, वाईट व्यक्ती, शोषक व्यक्ती, शोषित व्यक्ती ही वर्गवारीच बाद ठरते. मला तुझ्यामधून व्यवस्थेचे मूर्त होणे, व्यवस्थेची कार्यप्रणाली शोधायची आहे. माझी बांधिलकी या गोष्टीशी आहे. बा बाहुल्या, मला क्षमा कर. पण तू म्हणतोयस ते मला जमेल असे दिसत नाही.
मी क्रयवस्तू म्हणून जन्माला आलो हे खरं असेल. पण तुझं काय? तू क्रयवस्तू नाहीस याची तुला खात्री आहे काय? सावंतवाडीचा सुतार आणि तू यांच्यात नेमका काय फरक आहे?
बाहुल्याच्या या प्रश्नांचं काय करायचं, हरिश्चंद्रा?

मल्टिपल आयडेंटिटीवाला बाहुला -- ८
सावंतवाडीचा सुतार क्रयवस्तू तयार करतोय. सावंतवाडीचा सुतार गोष्टही सांगतोय. या गोष्टीची क्रयवस्तू होऊ नये याचा प्रयत्नही तो करतोय. जिचा अर्थ लावताना धडपडायला होतं, वेदना होतात, डोकं पिकतं अशी गोष्ट कोण विकत घेईल? मग विकली जातेय ती गोष्ट आणि त्रास देतेय ती गोष्ट असा भेद करायचा का?
हरिश्चंद्रा, तुझ्या लक्षात आलंय का? सावंतवाडीचा सुतार पुनरावृत्तीतून गोष्ट सांगतोय. बाहुल्याचाच आकृतिबंध तो पुनरावृत्त करतोय. गोष्टीत पुन्हा पुन्हा बाहुलाच घडतोय. या पुनरावृत्तीतून तो गोष्टीचं गोष्टपण मोडतोय आणि गोष्ट नसल्याची गोष्ट सांगतोय.
ही गोष्ट सांगताना, पुनरावृत्ती करताना, तो बाहुल्यांमध्ये छोटे छोटे भेद करीत पुढे निघाला आहे. आकार वेगळा हे तर आहेच. शिवाय कोणाच्या मिश्या किंचितशा वेगळ्या. कुणाचे डोळे वेगळे. कोणाच्या चेहऱ्यावरचा भाव वेगळा. गोष्ट पुढे जात नसली तरी हे भेद पुढे जाताहेत. हे भेदच पुनरावृत्तीला गतिशील करत आहेत. यातूनच गोष्ट तयार होते आहे.
सावंतवाडीच्या सुताराने सगळे सारखेच बाहुले केले असते तर गोष्ट तयार झाली नसती. त्या सहा स्वायत्त व्यक्ती झाल्या असत्या. सहा वेगवेगळे बाहुले केले असते तरी गोष्ट झाली नसती. कारण त्या सहाजणांमध्ये कुठलेच संबंध नसते. पुनरावृत्तीतून त्याने संबंध निर्माण केले आणि भेदांमधून घटनांना गती दिली.
पुनरावृत्ती कशी वापरावी हे सावंतवाडीचा सुतार मला शिकवतोय.
की मीच आहे तो?

मल्टिपल आयडेंटिटीवाला बाहुला -- ९
हा माझ्यावर आणखी एक अन्याय आहे. आता तू मला बाजूला ठेवतोयस आणि सावंतवाडीच्या सुताराला पुढं आणतोयस. त्याच्याच कर्तृत्वामुळं असं चिरफाळलेलं जिणं माझ्या वाट्याला आलेलं आहे. आणि आता तू त्यालाच नायक करायला निघालास. आणि शेवटी की मीच आहे तो असा प्रश्न विचारून तू स्वतःलाच पुढं आणतो आहेस. गोष्ट कुणाची आहे? माझी, त्याची की तुझी?
बाहुल्याच्या आवाजात राग ओतप्रोत भरलेला होता.
सोपवावीत का सगळी सूत्रं बाहुल्याच्या हाती? लावावे का त्याला लिहायला काय झक मारायची ती मार म्हणून? बसावे का गप्प हातातलं पेन बाजूला ठेवून?
निदान फेसबुकावरच्या बऱ्याच वाचकांना आनंद होईल.
कोणला का होईना, आनंद होणे महत्त्वाचे, हरिश्चंद्रा.
शिवाय नियंत्रण माझ्या हातून निसटतंय. लिहिण्याचं वास्तव आणि गोष्टीतलं जादुई वास्तव यांच्यात भांडण सुरू झालंय. जादुई वास्तव वास्तवाच्या अद्भुत छटा पुढं आणतंय तर लिहिण्याचं वास्तव हे सगळं केवळ लिहिणं आहे हे आवर्जून सांगतंय.
हरिश्चंद्रा, पळ आता इथून. नाही तर तू फक्त लिहिणं होशील. पळ काढ....

मल्टिपल आयडेंटिटीवाला बाहुला -- १०
मंडळी आता खरं काय ते सांगून टाकतो.
सावंतवाडीचा बाहुला माझ्या पुस्तकांच्या कपाटात सुरक्षित ठेवलेला होता. अधूनमधून छोटे लोक घरी आले की तो बाहेर निघायचा. तो एकच बाहुला मी सावंतवाडीवरून आणला होता. सावंतवाडीला असलेल्या अनेक दुकानांपैकी एका नेमक्या दुकानात जाऊन प्रवीणने तो मला घेऊन दिला होता. काही वर्षांपूर्वी.
सकाळी उठून तो बाहुला पाहावासा वाटला. आता त्याच्यावर एवढे लिहिल्यानंतर तो परत पाहण्याची इच्छा होणे साहजिकच म्हणायचे. मी कपाट उघडले आणि मला आश्चर्याचा धक्का बसला. त्याच्याशेजारी त्याच्याच वाणाची एक ठमाबाई अवतरली होती. बायकोला विचारलं, ही बाई कुठून आली? बायको म्हणाली, मला नाही बा ठाऊक. मी नाही आणली.
मग ही इथं कुठून आली? आता ती आल्यामुळं गोष्टीत कायकाय बदल होत जाणार. माझ्या प्लानमध्ये हे स्त्रीतत्त्व खरंच नव्हतं हो. हे आपल्याला पेलणारं प्रकरण नाही. हा गुंता आपल्याला उलगडणार नाही. हे माझ्या इच्छेशिवाय घडू लागलेलं आहे. गोष्ट आपणहून आकार धारण करू लागली आहे. स्वयंचलित झाली आहे.
आता इथं आपलं काय काम, हरिश्चंद्रा? तेव्हा पळा सर्वांचे आभार मानून.
आभार.......

- हरिश्चंद्र थोरात
मोबाइल : ९८१९०९४२३६

Address


Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Mukta Shabd posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Mukta Shabd:

Videos

Shortcuts

  • Address
  • Alerts
  • Contact The Business
  • Videos
  • Claim ownership or report listing
  • Want your business to be the top-listed Media Company?

Share